भिलवडी (प्रतिनिधी)
दुग्ध व्यवसायाचा माध्यमातून चितळे समूहाने क्रांती केली. काकासाहेब चितळे यांनी उद्योगा बरोबर सामाजिक क्षेत्रात निर्माण केलेल्या विचारांचा वारसा सर्वांनी पुढे नेऊया असे प्रतिपादन आमदार मोहनराव कदम यांनी केले. भिलवडी ता.पलूस येथे स्व.काकासाहेब चितळे अभिवादन समितीच्या वतीने आयोजित प्रथम पुण्यस्मरण दिननिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी आमदार मोहनराव कदम,उद्योगपती नानासाहेब चितळे,जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक महेंद्र लाड,ज्येष्ठ नेते आनंदराव मोहिते,माजी जिल्हा परिषद सदस्य संग्राम पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत काकासाहेब चितळे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी बोलताना नानासाहेब चितळे म्हणाले की, काकांनी उद्योगाबरोबर सामजिक उपक्रमातून भिलवडी गावचा नावलौकिक पुढे नेण्यासाठी काम केले.त्यांच्या अकाली जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरून काढणे गरजेचे आहे.
जिल्हा बँकेचे संचालक महेंद्र लाड म्हणाले की, चितळे समूहाने दूध उद्योगाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शेतीला उद्योगाला प्रोत्साहन दिले,नवऊद्योजक घडविले. सार्वजनिक सामाजिक, शैक्षणिक,वाचन चळवळीत ते अग्रेसर राहिले.सर्वांना सोबत घेऊन पुढे जायचा वसा निर्माण केला. यावेळी विश्वास चितळे,श्रीपाद चितळे,गिरीश चितळे,मकरंद चितळे,रघुनाथ देसाई, विलास पाटील,बाळासाहेब मोहिते,चंद्रकांत पाटील,राजेंद्र मोहिते आदी मान्यवरांसह भिलवडी परिसरातील नागरिक उपस्थित होते.प्रास्ताविक व स्वागत बी.डी.पाटील यांनी, सूत्रसंचालन सुभाष कवडे यांनी तर, आभार माजी सरपंच शहाजी गुरव यांनी मानले.
0 Comments