कडेगाव : नेर्ली येथील भुईमूग पिकाच्या नुकसानीची माहिती देताना शेतकरी.
नेर्ली/कडेगाव (संदीप कुलकर्णी)
कडेगाव तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतक-यांचे कृषी व महसूल विभागातर्फे पंचनामे सुरू आहेत आतापर्यंत ८३ टक्के पंचनामे पूर्ण झालेले आहेत तर येत्या दोन दिवसात शंभर टक्के पंचनामे पूर्ण होतील, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात येत आहे.
कडेगाव तालुक्यात मुसळधार पावसामुळे सोयाबीन, भुईमूग, हळद, आले, केळी, द्राक्ष या पिकांचे नुकसान झालेले आहे. शेतकऱ्याने सोसायटी, बँक यांच्याकडून कर्ज काढून तसेच अहोरात्र कष्ट करून पिके आणली. पण अवेळी झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे हातातोंडाशी आलेले पीक वाया गेले. त्यामुळे शेतकऱ्यांवर कर्जबाजारी होण्याची वेळ आलेली आहे. शेतकरी पूर्णपणे हतबल झालेला आहे शेतकऱ्यांना या संकटातून सावरण्यासाठी शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी पावले उचललेली आहेत.
तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कृषी व महसूल विभागाला पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्याच आदेशाची अंमलबजावणी म्हणून कडेगाव तालुक्यात कृषी व महसूल विभागाच्या वतीने शेत पिकांचे पंचनामे सुरू आहेत. यामध्ये कृषी विभागाचे कर्मचारी व गाव कामगार तलाठी आदींकडून ही पंचनामे सुरू आहेत. प्रांताधिकारी गणेश मरकड, तहसीलदार डॉक्टर शैलजा पाटील, तालुका कृषी अधिकारी बीजी कदम यांनी शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानीची पाहणी केली आहे.
................................
लवकरच शंभर टक्के
पंचनामे पूर्ण होतील...
ज्या शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झालेले आहे परंतु पंचनामे झाले नाहीत त्यांनी गाव कामगार तलाठी , कृषी सहायक तसेच ग्रामसेवक यांना माहिती देऊन आवश्यक असणारे कागदोपत्री पूर्तता करावी. लवकरच कडेगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतीचे शंभर टक्के पंचनामे पूर्ण होतील.
बी. जी. कदम
तालुका कृषी अधिकारी
0 Comments